Showing posts with label भूषण कुलकर्णी. Show all posts
Showing posts with label भूषण कुलकर्णी. Show all posts

तीन गझला : भूषण कुलकर्णी

.
 १.

निरनिराळे विचार लोकांचे
खूप येथे प्रकार लोकांचे

सुचत नव्हते उपाय प्रश्नावर
घेतले मग उधार लोकांचे

कोण चिंता करेल विश्वाची?
सर्व परिवार चार लोकांचे

आपला रंग दाखवत नाही
मन किती आरपार लोकांचे!

ठेवल्यावर गहाण लोकांना
शोभले सावकार लोकांचे

प्रश्न दिसतील आपले सोपे
त्रास काही निवार लोकांचे

जवळ जातील फार सत्याच्या
दु:ख इतके हुशार लोकांचे


२.

चाल पहिली हारल्याचा फील आला
डाव पुरता निसटल्याचा फील आला

येउनी गेलीस का तू याठिकाणी?
ही हवा झंकारल्याचा फील आला

ते गुलाबी ओठ जेव्हा पाहिले मी
पान माझे रंगल्याचा फील आला

ओळ तर साधीच होती बोललेली
पण उगाचच शिकवल्याचा फील आला

फेसबुक-इन्स्टा जरा उघडुन बघितले
मीच मागे राहिल्याचा फील आला

लक्ष्मणा, रेषा कुठे दिसलीच नाही!
मात्र ती ओलांडल्याचा फील आला

थांबलो क्षणभर तुझ्या दारात देवा
जन्म सगळा वाहिल्याचा फील आला

३.

ओळ तरलतम इतकी होती
सुचता सुचता सुटली होती

बंद तुझा दरवाजा होता
सताड उघडी खिडकी होती

चिंता ‘नावा‘लाही नव्हती
दगडू होता, दमडी होती

तुला यायला उशीर झाला
खपली सुद्धा पडली होती

पास-फेल ते नंतर ठरवू
तुझी इयत्ता कितवी होती?

पंखा गरगर फिरत राहिला
तुझी आठवण बिजली होती

................................
भूषण कुलकर्णी