Showing posts with label श्रीराम गिरी. Show all posts
Showing posts with label श्रीराम गिरी. Show all posts

तीन गझला : श्रीराम गिरी



१.

उंची मिळे कुणाला फुकटात वारशाने
मज पायरी दिली ह्या एकेक पायथ्याने‌

आहे गरज मनाला इतक्यात शांततेची
होईल शक्य सारे ह्या फक्त संयमाने

येईल उन्हात तब्बल गोकूळ नांदणारे
काढून घेतली जर ह्या सावली छताने

केल्यावरी समजले अवघा हिशोब येथे
बदलून फार गेला हा काळ थांबल्याने

केलेत केवढे तू उपकार काय सांगू
झालो प्रसिद्ध मीही दुनिये तुझ्या यशाने

२.

हवा तुला जर जगण्यामध्ये थरार थोडा 
हात आपल्या शत्रूवर तू उगार थोडा.

देऊन हात सावरले मज अलगद कोणी
होता माझ्या ज्या बाजूला उतार थोडा

होतो मी कंजूष, लालची जगाप्रमाणे
झालो देवा तुझ्यामुळे मी उदार थोडा

कुटुंब माझे इथे राबते पोटावारी
तुला वाटतो सहा आकडी पगार थोडा

नसते नंतर सुटका येथे या शपथांची
देण्यापूर्वी वचन करावा विचार थोडा.

३.

जे खरे सारे इथे मटक्यात आले
साव अवघे ह्या अता धंद्यात आले

मारला हा साप काठीने कुणाच्या
छान त्याचे नाव वापरण्यात आले

ते नको जाहीर जे केले इथे तू
सांग पडद्याआड जे रचण्यात आले

तथ्य होते केवढे शपथेत राणी
भंगलेल्या ह्या तुझ्या वचनात आले

काल होतो मी जिथे आहे तिथे पण
फार तू गेला पुढे लक्षात आले 

तोडला कोणी कळेना भरवसा हा
कोण हे ना सांगता मतल्यात आले

.................................
श्रीराम गिरी,बीड
८२७५७९९०१५