Showing posts with label सौभद्र. Show all posts
Showing posts with label सौभद्र. Show all posts

तीन गझला : सौभद्र


१.

तुझ्यावाचून एकाकी जरा होतो 
तरी मी आजच्यापेक्षा बरा होतो 

अताशा मी किती खोटारडा झालो 
तुला भेटायच्या आधी खरा होतो 

असे काहीच नव्हते होत यापूर्वी  
कशानेही अता मी घाबरा होतो!

तुला पाहून मी नुसताच दरवळतो   
तुला पाहून माझा मोगरा होतो

विषय जेव्हा कधीही आपला निघतो 
तुझा माझा गुलाबी चेहरा होतो 

तुला भेटायचे तेव्हा तुझे येणे
तुझ्यालेखी सदा मी मोहरा होतो 

जिथे भेटायचो बोलायचो आपण
तिथे आता मनाचा उंबरा होतो 

२.

तुझ्या रस्त्यात धगधगते निखारे,काळजी घे 
शिरू देऊ नको नाकात वारे, काळजी घे 

तुझ्या रस्त्यात मैलाचे दगड आहेत नुसते 
कुणी नाहीच रस्ता सांगणारे,काळजी घे 

इथे धावायची स्पर्धा सुरू आहे परंतू 
इथे जिंकून आले थांबणारे, काळजी घे 

किनारा शोधण्यातच जन्मही गेला कुणाचा
कुणी गोंजारले नुसते किनारे,काळजी घे 

परी स्वप्नातली नसते कुठेही ऐक बाळा
खरे असले जरी हे चंद्र -तारे,काळजी घे 

मला नाहीच शंका पण तरी हा प्रश्न छळतो 
तुला सारेच हे झेपेल कारे? काळजी घे !

जगाचा नेमका चेहरा कळो यावा म्हणूनच
तुला मी नेहमी केले इशारे, काळजी घे


३.

रक्तमांसाचे जरी गणगोत आपण 
आपल्यांसाठी कधी रडलोत आपण?

कोणत्या अज्ञात मार्गाचे प्रवासी?
कोणत्या नक्की हवेचा झोत आपण?

आपल्या रस्त्यावरी अंधार काळा 
आपली म्हणतो निराळी ज्योत आपण 

बेगडी वर्चस्ववादाचा तमाशा
त्यामुळे तर वेगळे झालोत आपण

एकमेकांना सदा पाण्यात पाहू 
पण अता पाणीच आलो होत आपण 

ठाम असण्यावर हमेशा ठाम असतो
मूलतत्त्वाचा पुरातन स्रोत आपण

आपल्यापाशी कुणीही येत नाही 
एवढे रोगट कसे आहोत आपण?