तग़ज़्ज़ुल अर्थात गझलीयत

             चित्र : साईनाथ फुसे

प्रिय गझल रसिकांनो नमस्कार! २०२२ हे ‘गझलकार सीमोल्लंघन ' अंकाचे चौदावे वर्ष. हा अंक आपल्या समोर ठेवतांना पुन्हा एकवार आनंद आणि दु:खाची संमिश्र अनुभूती व्यक्तीशः आम्हाला होते आहे. आनंद याचा की, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मान्यवर, नवोदित गझलकारांनी भरभरून प्रतिसाद दिला. गझला पाठवल्या. त्यापैकी निवडक गझलांना या अंकात समविष्ट केले आहे. आणि दु:ख याचे की, याच अंकात दोन श्रद्धांजलीपर लेख समाविष्ट करावे लागले. 

 कोरोनाचे संकट जरी धूसर झाले असले तरी परत कधी मान वर काढेल या अनामिक भीतीने आपण जगायला शिकलो आहोत. टाळेबंदीच्या काळात हातात आलेला मोबाईल पूर्णतः सुटलेला नाही. जनजीवन पूर्वपदावर येत आहे. उत्सव आणि सोहळ्यातून उल्हास ओसंडून वाहतो आहे. टाळेबंदी दरम्यान फेसबुक आणि WhatsApp वर उत्साहात कार्यशाळा घेणारे आता दिसेनासे झालेत. नव्या दमाने पूर्वी प्रमाणेच ऑफलाईन मुशायरे होत आहेत. या दरम्यान अचानक सक्रिय झालेली साहित्यिकांची पिढी पुन्हा दैनंदिन व्यापात गुरफटून गेलेली दिसते. सोशल मीडियावरचे त्यांचे विहरणे कमी झालेले जाणवते. तर काहींनी मात्र घेतलेला वसा अजून जपला आहे. उत्तम गझला लिहिताहेत. गझलेसारख्या तंत्रशुद्ध काव्यप्रकारात तरुण पिढी रमते आहे. ही बाब मराठी गझलेचे उज्ज्वल भविष्य अधोरेखित करणारी आहे. याचा मनस्वी आनंद होतो आहे.

गझलेचे तंत्र सांभाळून व्यक्त होणे एवढेही सोपे नाही; पण आपल्याकडे काव्यप्रतिभा, अभ्यास आणि जीवनानुभव गाठीशी असेल तर कठीणही नाही. गझलेच्या तंत्राचे बारकावे समजून घेण्यासाठी आवश्यकता भासते ते एखाद्या तज्ज्ञ, अभ्यासू मार्गदर्शकाची. आणि बहुतेकांची येथेच गोची होते. कवी स्वतः शिकत शिकत कधी मार्गदर्शक बनतो आणि त्याचे अभ्यास करणे थांबते हे त्यालाही कळत नाही. काही मार्गदर्शक तर स्वयंभू असतात. त्यांचा कोणीच गुरु नसतो. पण ते इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी कायम तत्पर असतात. मार्गदर्शन करण्याची एकही संधी न चुकवता काही अफलातून संकल्पनांना शब्दरूप देऊन त्या शब्दावलीच्या व्याख्या मांडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. उदा. गझलीयत, शेरीयत आदि. खरे तर अशा शब्दावली तयार करत बसण्यापेक्षा गझल हाही एक काव्यप्रकार आहे हे स्वीकारून उत्तम काव्यमूल्य गझलेत कसे आणता येईल यावर विचार करणे गरजेचे आहे. 

उर्दू साहित्य आणि छंदशास्त्रात गझलीयत-शेरीयत संकल्पनेसाठी मूळ शब्द आहे तग़ज़्ज़ुल. उस्ताद ख्वाब अकबराबादी यांनी त्याला ‘तग़ज़्ज़ुल’ संबोधले आहे. तग़ज़्ज़ुल म्हणजे शेरातील प्रतिमांच्या समीकरणांची भावनानिष्ठ समतानतेने मांडणी ज्यामुळे शेरामधील आशयसौंदर्य अधिक खुलेल. वाचणाऱ्याला चमत्कृती वाटावी इतके नावीन्य त्यात हवे. पण ही चमत्कृती अमूर्त चित्रकलेसारखी धूसर असता कामा नये. तशी ती धूसर असली तर तिचा वाचकाशी भाषेच्या माध्यमाने संवाद होऊ शकणार नाही. 

 तांत्रिकदृष्ट्या शेर कितीही बरोबर असला तरी त्यात वरील प्रकारचा तग़ज़्ज़ुल नसेल तर तो सपाट ठरतो. ख्वाब अकबराबादी यांनी तग़ज़्ज़ुलचे तीन प्रकार सांगितले - 

 १- क़दीमी तग़ज़्ज़ुल – रिवायती / पारंपरिक 
 २- जदीदी तग़ज़्ज़ुल - तरक्की पसंद / आधुनिक 
 ३- फ़िक्री तग़ज़्ज़ुल - तात्विक /
चिंतनशील 

 उर्दू गझलही सुरुवातीच्या काळात क़दीमी तग़ज़्ज़ुलने ओतप्रोत होती. प्रेयसी, प्रेमाच्या विळख्यात अडकली होती. कालांतराने त्यातून ती बाहेर पडली आणि जदीदी तग़ज़्ज़ुलकडे वळली. गझलेमध्ये जदीदी तग़ज़्ज़ुलच्या प्रवेशामुळे भाषा आणि आशयमांडणीतही बदल झाले. या परिस्थितीत उर्दू शायरांनी तग़ज़्ज़ुलशी तडजोड न करता अरबी, फारसी आणि उर्दू व्यतिरिक्त बोलल्या जाणार्‍या प्रांतीय भाषा आत्मसात केल्या. प्रांतीय भाषा आणि बोलीभाषेतील शब्दांना घेऊन ते गझल निर्मिती करू लागले. प्रांतीय भाषेसोबतच प्रांतीय तत्त्वज्ञान आले. तेही फ़िक्री तग़ज़्ज़ुल मधून व्यक्त होऊ लागले. जदीदी गझलेच्या पार्श्वभूमीवर उर्दू भाषाशास्त्र व स्वरशास्त्र जसेच्या तसे वापरणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यात सवलतींचा शिरकाव झाला. पण आज सवलती घेऊनही उत्तम तग़ज़्ज़ुल असलेल्या गझला लिहिल्या जात आहेत .जे गझलेवर प्रेम करतात ते अभ्यास आणि गरजेनुसार स्वतःला अद्ययावत ठेवत असतात. पण जे असे करत नाहीत, ते ‘तीच-ती पुनरावृत्ती’ करण्याच्या आहारी जातात. म्हणूनच उत्तम शेर वा गझल लिहिण्यासाठी तंत्रासोबतचआशयनिष्ठ तग़ज़्ज़ुल महत्त्वाचा आहे.

 काव्य /शायरी म्हणजे काय असते तर मानवी सुख, दु:ख, प्रेम, अनुभव, गरज, भाव, भावना, विचार, लाचारी, वेदना, आदींना शब्दरुपाने अभिव्यक्त करणारी व्यवस्था आहे. तरीपण तथाकथित अभ्यासक, समीक्षक, टीकाकार त्यावर आपले मत नोंदवून तिला उत्तम किंवा दुय्यम ठरवत असतात. शेवटी हा उपद्व्यापही तौलनिक अभ्यासातून आलेला असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे-समीक्षक असो की कवी त्याला स्वतःचे स्वतंत्र असे मत असते. त्यामुळेच उत्तम शेर / गझल या बाबतीत एकवाक्यता होणे अशक्य. एखादा शेर रसिकाला वाह! क्या बात है असे म्हणायला भाग पाडत नाही म्हणजे तो शेर उत्तम शेर नव्हे का? कदाचित असेलही. हे त्या रसिकाच्या अभ्यासावर, अनुभवावर आणि गुणग्राहकतेवर अवलंबून असते. पहिल्यांदाच ऐकलेला साधाही शेर उत्तम वाटू शकतो तर एखादा उत्तम शेर वारंवार ऐकल्यामुळे रटाळ वाटू शकतो. 

 खरे तर गझलेत / शेरात वापरलेल्या प्रतिमा आणि प्रतीके शेराला वेगळेपण प्राप्त करून देत असतात. काळ कोणताही असू द्या. प्रतिमांचे काव्यात्मक संदर्भ बदलत जातात. अजूनही शायर चंद्र, तारे, सूर्य, पृथ्वी, आकाश, फुले, पाने, निसर्ग, मानवी भाव-भावना व्यक्त करण्यासाठी प्रतीकात्मक उपयोग करतो. मीर, गालिबही वापरत होते. पण शेरातून अभिव्यक्त होणारी भावना, स्थिती यामध्ये टोकाचा फरक दिसतो. शब्द तेच, भावभावनाही त्याच पण त्यांना आपल्या स्वतःच्या शैलीमध्ये सादर करण्याचे कौशल्य हे प्रत्येक शायराचे वेगळे आहे. म्हणूनच आपण काहीतरी अकल्पनीय लिहिले म्हणजे आधुनिक किवा पारंपरिक ठरत नाही. तर आपण लिहिलेले रसिकांच्या मनाला भिडले पाहिजे हे जास्त महत्त्वाचे. साहित्य कधीही काळाच्या पुढे जात नसते किंवा मागे राहत नसते. ज्या काळात ते लिहिल्या जाते त्याच काळात वाचकांना, समीक्षकांना समजणे अपेक्षित असते. तेच साहित्य हृदयाचा ठाव घेणारे ठरते. गझलेचेही असेच आहे. ज्या शायरांनी तंत्र, आशयघनता आणि मांडणीतले नावीन्य सांभाळले तेच आपला विचार, गझल रसिकांपर्यंत पोचवण्यात यशस्वी झालेत.

 ‘गझलकार सीमोल्लंघन २०२२’ अंकात १३५ सहभागी गझलकारांच्या सुमारे ४०० गझलांचा आस्वाद आपण या दीपावली पर्वात घेऊ शकणार आहात. अनेक सन्माननीय गझलकार आणि नव्या उमेदीने लिहिणारे नवगझलकारांच्या उत्तमोत्तम गझलांचा कारवाँ सोबत घेऊन प्रवास करणारा हा मराठी गझल विशेषांक आहे. म्हणूनच जगभरातील सर्व गझल रसिकांना हा विशेषांक सर्वांगाने आनंदानुभूती देईल यात शंका नाही. अंकाच्या ‘विशेष’ सदरात गझलगंधर्व सुधाकर कदम यांनी 'दूर तिथे घन बरसे ' या गझलेच्या सांगितिक निर्मितीचा प्रवास आणि संगीतकार, गायक प्रा. हर्षवर्धन मानकर यांनी संगीतबद्ध करून गा गायिलेली गझलकार श्रीकृष्ण राऊत यांची 'तुझ्या हासण्याचे दिवाणे किती ' ह्या सदाबहार गझलेचा ऑडिओ-व्हिडिओ रुपात आस्वाद घेता येणार आहे. हेमंत पुणेकर यांचा 'गझल लिहिणे बंद करा ' शीर्षकाचा गझलेतील भाषेच्या लवचिकतेचा स्वीकार का करावा हे सोदाहरण समजून सांगणारा लेख आहे. तर कालिदास चवडेकरांच्या पाच हझला आपल्याला निश्चितच विशेष आनंद देऊन जातील. व्यंकटेश कुळकर्णी यांचा ‘मराठी गझल:आशय संपन्नता की तंत्रशरणता? या शीर्षकाचा लेख नवगझलकारांना गझलतंत्राविषयी मार्गदर्शन करीत नवी दृष्टी प्रदान करतो. ‘मुस्लीम मराठी गझलकारांचे मौलिक योगदान’ हा बदिऊज्जमा बिराजदार यांचा लेख मराठीतून गझल लेखन करणाऱ्या मुस्लीम गझलकारांची ओळख करून देणारा आहे. 

या सोबतच ‘आस्वाद’ या सदरात अशोक वाडकर यांनी 'आमची गझलसाद ' या प्रातिनिधिक गझलसंग्रहाच्या निर्मितीचा प्रवास आणि परिचय त्यांच्या लेखातून करून दिला आहे. इलाहींच्या 'एकाकीपण 'या गझलेचे अतिशय सुंदर रसग्रहण रोहिणी पांडे यांनी केले आहे. त्याचप्रमाणे 'गझल प्रेमऋतूची’ हा प्रेमाचा विषय घेऊन प्रा. सुनंदा पाटील गझलनंदा आणि प्रसाद कुलकर्णी यांच्या गझलसंग्रहाचा परिचय सौ. सरोज अंदनकर यांनी करून दिला आहे. श्रीकृष्ण राऊत यांच्या 'गझलाई ' या आस्वादात्मक लेखसंग्रहावर 'गझलाई : समकालीन गझलचे प्रातिनिधिक प्रतिबिंब ' हा समीक्षणात्मक लेख शिवाजी जवरे यांनी लिहिला आहे. भूषण कुळकर्णी यांच्या गझलसंग्रहाचे रसग्रहण ‘ चौकोनी अंबर: तरुणाईची गझल’ या शीर्षकाचा लेख अविनाश चिंचवडकर यांनी लाघवी भाषेत केले आहे. संतोष कांबळे यांच्या ‘तुकोबाच्या कुळाचा वंश’ या गझलसंग्रहाचे रसग्रहण निशा डांगे यांनी केले आहे. निलेश कवडे यांच्या ‘दस्ती’ या गझलसंग्रहाचे रसग्रहण ‘सर्वसामान्यांच्या वेदना अंकित करणारी अभिव्यक्ती : दस्ती’ या शीर्षकाने अरुण विघ्ने यांनी केले आहे. अल्पना देशमुख-नायक यांच्या 'नदीला गाज नाही ' या गझलसंग्रहाचा परिचय चंद्रकांत धस यांनी करून दिला आहे. सुरेश भटांच्या ‘रंगुनी रंगात साऱ्या’ या गझलेचे रसग्रहण किरण डोंगरदिवे यांनी केले आहे. तसेच श्रीकृष्ण राऊत यांच्या गझल पण 'बोलकी ' आहे ! हे विनोद देवरकर यांनी केलेले रसग्रहण उत्कृष्ट आहे.अविनाश सांगोलेकर यांच्या ‘अविनाश पासष्टी’ या गझलसंग्रहाचे दीपक करंदीकर यांनी ‘सामाजिक हतबलतेतून जगण्याचे भान देणारी अविनाश पासष्टी’ या शीर्षकाखाली उत्तम परीक्षण केले आहे. 

 या वर्षी आपण काही गझलकार मित्रांना गमावले. ही बाब निश्चितच दु:खदायी आहे. ‘जसे येते तसे घ्यावे प्रिया आयुष्य वाट्याला’ हा अमोल शिरसाट यांचा लेख गझलकारा सुप्रिया मिलिंद जाधव यांच्या अभिव्यक्तीवर प्रकाश टाकणारा आहे. गझलेसोबत घालवलेल्या चिरंतन क्षणाची उजळणी करणारा आहे. योगिता पाटील यांनी 'मैत्र जीवांचे जपणारे गझलकार : कमलाकर देसले ' या लेखात त्यांचे अजातशत्रू व्यक्तिमत्व समर्पक शब्दात मांडले आहे. या दोन्ही गझलकारांना भावपूर्ण श्रद्धांजली. 

औरंगाबादस्थित साईनाथ फुसे यांनी काढलेले छायाचित्र मुखपृष्ठाकरिता उपलब्ध करून दिले. ग्राफिक्सच्या माध्यमातून विनोद देवरकर यांनी त्याला सुरेख केले. यांच्यासह सर्व गझलकार, गझलकारा, अभ्यासक यांच्या लेखन सहकार्याशिवाय अंक साकार होणे अशक्य होते, याची नम्र जाणीव संपादकांना आहे. म्हणूनच प्रस्तुत अंकाला योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. आजपर्यंत प्रकाशित झालेल्या 'गझलकार सीमोल्लंघन'च्या सर्वच अंकांना जगभरातल्या मराठी गझल रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. याही वर्षी तो अपेक्षित आहे. सर्वांना सीमोल्लंघनाच्या-दीपावलीच्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा. 

 - संपादक

दोन गझला : कीर्ती वैराळकर-इंगोले

 



१.


खरे तर वाद दोघांचे तसेही लाजमी होते 

नको कळवूस दुनियेला उगीचच बातमी होते


मला तू भेटल्यावरती निसटला तोल का नकळत 

तुला भेटायच्या आधी तशी मी संयमी होते


सुखी दिसली कधी त्याला, किती नाराज होतो तो

मला जर दुःख झाले तर व्यथा त्याची कमी होते


हिरो झालास तू माझ्या नशीबाच्या सिनेमाचा

मला उशिरा कळाले मी तुझ्यासाठी डमी होते


मला तर एकदाही येत का नाही खरी जोडी

कशी दुःखा तुझी एकाच  पत्त्याने रमी होते


जिभेला लावली आहेस इतकी धार तू हल्ली

तुझे समजून घेताना कितीदा मी शमी होते


२. 


पुन्हा का तेच ते होते मनाजोगे घडत नाही

फरक पडलाय इतका की फरक काही पडत नाही


किती झाली सवय होती तुझी या दोन डोळ्यांना

अताशा कंठ दाटे पण तरीही मी रडत नाही


कधी काळी हवेसे एकमेकांना किती आपण 

अताशा फार माझेही तुझ्या वाचुन अडत नाही


तुला बागेत येणे शक्य नाही आपल्या परतुन

नजर आता तशी पूर्वीप्रमाणे बागडत नाही


जिथे घेऊन शपथा सात जन्माच्या परतलेलो

तिथे तर एक सुद्धा खूण त्यांची सापडत नाही

............................

किर्ती वैराळकर-इंगोले


दोन गझला : स्वाती शुक्ल

 



१.


जिथे तिथे पुन्हा पुन्हा दिसेल जर तुझेच घर

कशास गाव सोडला कशास सोडले शहर


रुते कट्यार खोलवर तशीच रोखली नजर

तशात श्वास हे तुझे शरीर भर जणू जहर


मला जमेल का कधी वळून पाहणे तुला

मुळात लाजरीच मी तशात ही तुझी नजर


समोर भेटल्यावरी जरी नकार द्यायचे

मनात भेटण्यास हे अधीर व्हायचे अधर! 


तुला बघून का अशा मुजोर व्हायच्या बटा

उडायच्या हवेवरी जसा उडायचा पदर


नवीन वाटतो जरी  तुझाच जन्म हा तुला

जुन्याच पुस्तकास 'तो ' नवीन घालतो कवर! 


२.


नको वाटतो जन्म हा पांगळा की जिथे मोकळे भेटता येत नाही

पुन्हा जोडव्यांचे वजन एवढे की मला उंबरा लांघता येत नाही


जरी वाटते हीच ती वेळ आहे जिथे एकटे भेटणे शक्य आहे

तरी सभ्यता आडवी येत जाते मला दारही लावता येत नाही !


तिथे पैलतीरी तुझे गाव आहे मधे या नदीला भला पूर आहे

इथे कागदी नाव माझी अशी की किनारा तिला गाठता येत नाही


तुझे श्वास चाफा सुगंधी तरीही इथे माळला मोगरा मी कधीचा

किती दरवळावे उगा अंगणी तू मला जर तुला वेचता येत नाही... 


तुला ब्लॉक केले पुन्हा फेसबुकवर तुझे नाव केले डिलिट पण तरीही

मनावर तुझ्या गोंदलेल्या खुणांना किती खोडले खोडता येत नाही


मनाची अवस्था अशी दीनवाणी कुणाला खरे सांगता येत नाही

तुझा त्रास होतो नको वाटतो जो तरीही तुला सोडता येत नाही


किती शब्द माझे अडकलेत आणिक किती श्वास घेणेच राहून गेले

तरीही गळ्याभोवती बांधलेले मला डोरले काढता येत नाही

................................


दोन गझला : ममता

 



१.


स्पर्शात नदी होती नजरेत झरे होते

जे प्रेम तुझ्यावर होते... खरेखुरे होते


कुठे काय होते रे माझे सांगायाला

तू माझा होतास एवढेच पुरे होते


खरे खरे ते लिहायची हिम्मत केली मी

त्या गझलेमधले  सगळे शेर खरे होते


नंतर नंतर ऊन वाढले नात्यामध्ये

आधी आधीचे पावसाळे बरे होते


बघून झाले.. बुडून गेले.. सरून गेले...

डोहाचे डोळे फार फार गहिरे होते


२.


तूच बघ काय केलीस माझी दशा 

रे, तुझ्या दोन डोळ्यात आहे नशा!


मौन ओठात  ठेवून नजरेमधे

हे किती प्रश्न आणि किती चौकशा


चल करू ठीक सारे पुन्हा पूर्ववत

पण चुका ही करूया जशा च्या तशा


गार हिरवे पुन्हा ऊन झाल्यामुळे

भोवती सावल्या छानशा छानशा


ज्यात सामावले विश्व  माझे तुझे

त्या मनाच्या व्यथा एवढ्याशा कशा?


चार मिनिटात सरले विषय चारशे

आणि हातामधे राहिल्या कपबशा


मीच होती दिली दाद ओठातुनी

आज टाळ्या पुन्हा वाजवू का तशा


मी जरा हासले...पांगल्या मैफिली

मी रडू लागता केवढा हा हशा


मग पुढे दूर गेले तुझे मित्रही 

ना मला राहिल्या मैत्रिणी फारशा

तीन गझला : अविनाश चिंचवडकर

 



१.

माझ्या मनात आता पेटून आग आहे
आताच या जगाला येणार जाग आहे

जेथे कळ्याच साऱ्या तोडून टाकलेल्या
येथे अशी अनोखी शोभून बाग आहे

आता उरात साऱ्या दाबून हुंदक्यांना
हासून गीत गाणे ओठांस भाग आहे

कानात चांदण्यांच्या सांगून रात्र गेली
चंद्रास या कधीचा लागून डाग आहे

राहू कसा कळ्यांच्या मी आज सोबतीला?
जेव्हा कुणी शिकारी काढून माग आहे

२.

हा भार वेदनांचा मी वाहणार नाही
मागे वळून आता मी पाहणार नाही

सोसायचा किती हा अंधार जाणिवांचा
अन्याय हा युगांचा मी साहणार नाही

ही लेखणीच जेव्हा होईल पारखी मज
तेव्हा उगीच काही मी रेखणार नाही

केले कितीक वेळा उध्वस्त ज्या विषाने
तो घोट आसवांचा मी प्राशणार नाही

माझ्या नवीन वाटा; माझे नवे किनारे
माझ्या मनात आता मी राहणार नाही

३.

जो वार होता; हळुवार होता
माझ्यावरी हा उपकार होता

ते प्रेम खोटे, फसवे दिखाऊ
तो चोख त्यांचा व्यवहार होता

आधार तू तो एकदा दिलेला
होता क्षणांचा पण फार होता

दाटून येते सय काळजाशी
हा घाव त्यांचा दिलदार होता

माझा म्हणूनी जोपासलेला
तोही न माझा अधिकार होता
.................................
अविनाश चिंचवडकर,
बंगलोर
avinashsc@yahoo.com
9986196940

तीन गझला : मनीषा नाईक




१.

आठवणींचा फुलतो चाफा 
रोज नव्याने छळतो चाफा 

मी दरवळते मनापासुनी
तो प्रेमाने म्हणतो चाफा

तुझ्या भोवती माझी रुंजी
तुझ्या अंगणी फुलतो चाफा 

शाळा, रस्ता, नदी किनारा
अजून भटकत असतो चाफा

काया होते अत्तर माझी
एकांती आठवतो चाफा

कसे गुंतणे टाळू सांगा
मागे मागे फिरतो चाफा

तुझे नाव ओठावर येते
गालावरती फुलतो चाफा

कपाट, संदुक, जुनी डायरी
किती ठिकाणी लपतो चाफा

म्हणून आहे जगणे सुंदर
सदा भोवती असतो चाफा

कोणी धाडा निरोप त्याला
फार मला आवडतो चाफा

भेट घडवतो दोन जिवांची
जन्म सुगंधी करतो चाफा

२.

केवढी चर्चा उगाचच गाजला होता चहा
फार नाही फक्त सोबत घेतला होता चहा 

काय सांगू, काय बोलू, भेट घेऊ की नको 
होय नाही संभ्रमातच लांबला होता चहा 

छानसा शेजार होता गोड होती माणसे 
आपल्या गावात सुद्धा चांगला होता चहा 

आपला कॉलेज कट्टा मित्र आणिक मैत्रिणी 
मी किती वेळा पणाला लावला होता चहा 

रात्रभर अभ्यास जेव्हा चालला होता कधी
एक आई आणि दुसरा जागला होता चहा

केवढा आनंद होता केवढी होती मजा 
खायला काहीच नव्हते प्यायला होता चहा 

ती तुझी चिठ्ठी गुलाबी भेटली होती मला 
लोकनिंदेच्या भयाने टाळला होता चहा 

एक कप,भरपूर गप्पा, थांबला तू तासभर  
फार तेव्हा गोड बाई लागला होता चहा

शब्द नव्हते फारसे पहिलीच होती भेट ती   
बोलली होती नजर अन् बोलला होता चहा 

मागणी घालायला आलास जेव्हा तू घरी 
केवढा हासत तुला मी आणला होता चहा 

आजही जाते तिथे मी आजही रेंगाळते 
तू जिथे भेटीत पहिल्या पाजला होता चहा 

३.

प्रत्येकाचा आत्मा असतो निर्मोही
प्रत्येकाच्या मनात आसक्त ययाती

गरजे पुरता संवाद एकमेकांशी
गरजे पुरते नाते जपले दोघांनी

होय असू शकते उत्तर माझे सुद्धा
बोल एकदा मनातले तू माझ्याशी

इतके सगळे प्रश्न आहेत लोकांना
इतकी सगळी नवी कारणे जगण्याची

प्रथम भेटलो,दुरावलो, पुन्हा भेटलो
युगायुगांचा प्रवास केला दोघांनी

पंख नवे,जिद्द नवी,आभाळ मोकळे
सोड पिंजरा धडपड कर जगण्यासाठी

अखंड चालू कारभार या दुनियेचा
अंता नंतर सुरू कहाणी जन्माची

गझल पण 'बोलकी' आहे ! :विनोद देवरकर

 



श्रीकृष्ण राऊत यांची एक आशयघन गझल नुकतीच वाचण्यात आली.  महामाया (लगागागाx२) या छोट्या वृत्तात लिहिलेली नितांत सुंदर गझल चिंतन आणि मनन करण्यास भाग पाडते. मुळात छोट्या वृत्तात अर्थसंपन्न गझल लिहिणे कठीणच काम. तसेही गझलेत फालतू शब्दांना जागा नसतेच, परंतु कमी अक्षरसंख्येत अनेकार्थसूचक, अर्थगर्भ आणि रसिकांच्या काळजाला थेट भिडणारी गझल लिहावयाची असेल तर गझलकाराची जबाबदारी आणखीनच वाढते. 

सुरेश भटांच्या एल्गार (१९८३) या गझलसंग्रहाच्या प्रकाशनानंतर अवघ्या सहा वर्षातच श्रीकृष्ण राऊत यांचा गुलाल (१९८९) हा गझलसंग्रह प्रकाशित झाला. कालखंडाचा विचार केल्यास ते गझलसम्राट सुरेश भटांचे समकालीन गझलकार. परंतु त्यांच्या दोघांच्या वयातील अंतराचा विचार केला तर मात्र सुरेश भटांनंतरच्या पहिल्या पिढीतील अग्रणी, मान्यताप्राप्त गझलकार म्हणून आपण त्यांना ओळखतो. गेल्या चार दशकांपासून त्यांची स्वतंत्र अभिव्यक्तीची, तंत्रशुद्ध आणि आशयघन गझल मराठमोळ्या रसिकांच्या मनावर अधिराज्य करते आहे. वैश्विक तत्वज्ञानात दडलेले चिरंतन सत्य गझलेच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहचवण्यात त्याचा हातखंडा. तर ती गझल -

जरा शैली जुनी आहे

गझल पण बोलकी आहे

तुझा संसार सौख्याचा

तुझी पत्नी मुकी आहे

जखम भरणार ही नक्की

दवाई झोंबरी आहे

तुझ्या डोक्यात कोरोना

तुझी तबियत कशी आहे?

अरे जी वंश वाढवते

परी नाही,बरी आहे !

किती निर्लज्ज टोकाची

इमोजी हासरी आहे

सुरा-तालात का कच्ची

नवी जर ढोलकी आहे


 - श्रीकृष्ण राऊत

प्रस्तुत गझल ही सात शेरांची गैरमुसलसल गझल. दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या शब्दांचे, प्रतिमांचे चपखल उपयोजन त्यांनी गझलेत केले आहे. 'कोरोना ' 'इमोजी ' या आजमितीच्या प्रतिमांचा सुयोग्य वापर केला आहे. या मुरद्दफ गझलेत स्वर-काफियाचा उपयोग केला गेला आहे. स्वर-काफियाचा वापर गझलेतील शब्दयोजनेस अधिक लवचिकता प्रदान करतो. या गझलेत 'आहे' हा रदीफ असून मतल्याच्या दोन्ही मिसऱ्यात आणि नंतरच्या शेरांमध्ये शेराच्या फक्त सानी मिसऱ्यात पुनरावृत्त होतो. यामध्ये रदीफच्या आधी येणाऱ्या काफियाच्या शेवटी ‘ई‘ स्वर स्थिर असल्यामुळे याला स्वर-काफिया म्हणतात. गझलेत वापरलेले कवाफी बघितले तर हे लक्षात येईल-'जुनी ', 'बोलकी ', 'मुकी ', 'झोंबरी ', 'कशी ', 'बरी ', 'हासरी 'आणि 'ढोलकी ' या सर्वांचा शेवट ईकारांत आहे. गझलशास्त्र अभ्यासकांच्या मते मराठी गझलेने स्वर-काफिया फारसा स्वीकारलेला नसला तरी उर्दू-हिंदीत साधारणतः चाळीस टक्के गझला स्वर काफियांच्या आढळतात. राऊतांच्याही मोजक्या चार- पाच गझलाच स्वर काफियाच्या आहेत. त्या पैकीच ही एक. 

श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलेची नाळ नव्या प्रतिमा, नवे संदर्भ वैश्विक तत्वज्ञानाशी जुळलेली असल्यामुळे ही गझल खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकातील गझल म्हणता येईल.

सुरेश भटांचा वारसा आणि वर्तमानाचा आरसा घेऊन गझललेखन करीत असल्यामुळे श्रीकृष्ण राऊत गझलेच्या मतल्यातच हे सत्य सांगून मोकळे होतात. ते म्हणतात,

'जरा शैली जुनी आहे

गझल पण बोलकी आहे'

'जुने ते सोडावे, नवे पांघरावे' या विचारसरणीच्या नव्या आणि जुन्या पिढीला हे ‘स्वीकारलेच‘ पाहिजे असे म्हटलेले आवडत नाही. कारण नव्या युगाची, विज्ञानाची, तंत्राची आणि बदलाची कास त्यांनी धरलेली असते. काळानुरूप बदल स्वीकारणे गरजेचेही असते. पण याचा अर्थ असा नव्हे की, जुने ते सगळेच कालबाह्य. त्यातही  आयुष्याला बळ, आनंद आणि झिंग आणणाऱ्या गोष्टी बहुतांश जुन्याच असतात. उदा. औषधामध्ये सर्वोत्तम रसायन म्हणजे मध, जेवढे जुने तेवढे चांगले. केवळ वाचन, चिंतन आणि मनन केल्यानेही आनंद देणारे, जीवनमूल्ये रुजवणारे वेद, ऋचा, उपनिषदे, संत वाङ्मय हेही जुनेच. आणि झिंग आणणाऱ्या मदिरेबद्दल तर सांगायलाच नको. पण हाडाचा कवी आणि अनुभवी वैद्य कडू सत्य व औषधालाही मधुर मुलामा देऊन गळी उतरवतोच. हेच कौशल्य राऊत यांनी आत्मसात केले आहे हे प्रस्तुत शेराच्या मांडणीतून लक्षात येते. गझल तंत्राच्या बाबतीत तडजोड न करताही आशयगर्भ मिसरे रसिकांशी प्रभावी संवाद साधू शकतात आणि साहित्यिक पुरोगाम्यांच्या मनावर अंकित होतात. 

माणूस जन्माला येताना एकटा अन् जातानाही एकटाच. पण त्याची निर्मिती मात्र स्त्री पुरुष एकत्र आल्याशिवाय होत नाही. एकत्र येण्याच्या, राहण्याच्या आणि सृजनाच्या प्रक्रियेस बळकटी देणाऱ्या संस्थेस संसार म्हणतात. मूलतः भिन्न शारीरिक, मानसिक वैशिष्ट्यांसह जन्माला आलेले, वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक वातावरणात वाढलेले दोन जीव एकत्र येऊन संसार थाटतात. अशावेळी एकमेकांना समजून घेत संसार सुरळीत होत असला तरी अनेक बाबतीत मतभिन्नता असणे स्वाभाविक असते. त्यामुळे प्रसंगी पती पत्नीमधे वादही होतात. विकोपाला जातात. अशावेळी दोघांपैकी एकाने शांत राहिले तर बहुतेक अप्रिय वाद शमतात. टाळले जातात. हे वैश्विक सत्य मांडतांना ते लिहितात-

'तुझा संसार सौख्याचा;

तुझी पत्नी मुकी आहे '

इथे कवी पुरुषप्रधान मानसिकतेचे प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे 'मुकी पत्नी' असा उल्लेख आला आहे. परंतु तो तसाच्या तसा न घेता स्त्रीप्रधान मानसिकतेने 'मुका पती' असे वाचले तरीही, परिणामी 'सौख्याचा संसारच' होणार आहे. संसारात दोघांपैकी एकाच्या मुका/ मुकी होण्याने जीवनात सुखाचा प्रवेश होणार असेल तर ते मुकेपणही सहर्ष स्वीकारले पाहिजे ही अनुभूती रसिकांच्या काळजात शिरतो. 

राऊत यांचे शेर स्वप्नरंजन विश्वात विहरत नाहीत. कपोलकल्पनेच्या कक्षेत अडकत नाहीत. वास्तविक परिस्थिती आणि शास्त्रीय अधिष्ठान त्यांच्या अभिव्यक्तीला असते. परंतु सर्वसामान्य रसिकाला शास्त्रीय पेक्षा व्यावहारिक ज्ञान महत्वाचे असते. वानगी दाखल हा शेर बघा- 

'जखम भरणार ही नक्की

दवाई झोंबरी आहे '

माणसाचे जीवन जसे षडरिपुने व्याप्त आहे तसेच त्यापासून उत्पन्न होणारे आजार दूर करण्यासाठी आयुर्वेदाने षडरसयुक्त औषधी सांगितलेल्या आहेत. जसे मधुर, अम्ल, लवण, कटु, तिक्त आणि कषाय. प्रत्येकाचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. पण या शेरात उल्लेख आहे तो जखमेच्या आणि त्यावरील औषधाचा. त्वचाविकार किंवा जखम दुरुस्त करण्यासाठी आयुर्वेद प्रामुख्याने कटुरसयुक्त औषधीचे सेवन करावयास सांगते. कटुरस हा जिभेला आणि त्वचेला झोंबणारा असतो जो प्रामुख्याने पित्तरोग नष्ट करतो. म्हणून प्रस्तुत शेरातून ते सांगतात की, सत्य हे झोंबणारे,  कडवे, अप्रिय जरी असले तरी  भ्रष्ट कृती, आचार आणि विचार यामुळे उत्पन्न होणाऱ्या मानवी जीवनातील सामाजिक आणि मानसिक व्याधी दूर करणारे प्रभावी औषध असते. औषध कडू, झोंबरे असले तरी त्याचे सेवन तज्ज्ञ वैद्याच्या मार्गदर्शनाखाली घेतले तर रोग समुळ नष्ट होऊ शकतो.   

रोग निवारणासाठी औषधासोबतच आपले मन आणि बुद्धी कशी काम करते हे सांगताना कवी लिहितो-

'तुझ्या डोक्यात कोरोना

तुझी तबियत कशी आहे? '

आपण जाणतोच, सुदृढ शरीरात निकोप मनाचा वास असतो. प्रथमदर्शनी हे पटण्यासारखे आहे. परंतु शरीर बलदंड करण्यासाठीही मनाची मंजुरी मिळणे अत्यंत महत्वाची असते. ती मिळाली तरच व्यायाम, अन्यथा आराम.   माणसाचे मन आणि मेंदू सक्रिय असेल तर बुद्धी कृतिशील होते आणि जीवनात योग्य ते निर्णय घेतले जातात. अशक्यप्राय वाटणाऱ्या पण आत्मशक्तीच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर मरणाच्याही दारातून परत आलेल्या अनेक व्यक्तींना आपण जाणतोच. डोक्यात चुकीचा, नकारात्मक विचार ठाण मांडून बसला असेल तर चांगले परिणाम देऊ शकणार नाही. हे कवी जाणतात. म्हणूनच उपरोधिकपणे "तब्येत कशी आहे?" हे विचारून, 'आधी मनातून भीती काढून टाक' हेही तेवढ्याच आत्मविश्वासाने सांगतात. 

स्वप्ने नेहमीच मानवाला भुरळ घालत आली आहेत. स्वप्ने कधी वास्तवात उतरतात तर कधी वास्तवात आणण्यासाठी आयुष्य अपुरे पडते. पण त्यामुळे माणूस स्वप्नही बघणे सोडत नाही अन् वास्तवात जगणेही. जगण्याचा आनंद घेण्यासाठी समाधानी होणं गरजेचं. अनंत उच्चकोटीच्या इच्छा बाळगणारा मनुष्य जे पदरात पडले त्यालाही गोड मानून समाधानी राहण्याचा प्रयत्न करत असतो. नेमका हाच प्रयत्न त्यांनी  शेरातून सहजपणे मांडला आहे -

'अरे जी वंश वाढवते

परी नाही, बरी आहे! '

जीवनात पतीपत्नी एकत्र येण्याचे प्रयोजन काय? तर वंशवृद्धी आणि आजीवन साथ. त्यासाठी सौंदर्यवती परी काय अन् सर्वसामान्य नारी काय? कुणीही चालेल. कारण सौंदर्य कालबाधित आहे. कायम टिकणारे नाही. म्हणूनच वास्तव स्वीकारून जगले पाहिजे. जीवनात प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळतेच असे नाही. पण प्राप्त परिस्थितीत जे मिळाले, जे आहे त्याच्या सहाय्याने ध्येय साध्य केल्या जाऊ शकते हा आशावाद वरील शेर वाचताक्षणीच मनात रुजवतो. 

सृष्टीतील प्रत्येक घटना निश्चित परिणाम साधत असते. आणि असे घडण्यामागे 'कारण' निश्चित असते. हाच नियम आपल्यालाही लागू होतो. 'क्रिया आणि प्रतिक्रिया' यावरूनच आपले सजीवत्व सिद्ध होत असते. सजीवांच्या लक्षावधी जातींमध्ये मनुष्य ही विलक्षण बौद्धिक क्षमता असलेली प्राणिजात. सृष्टीमध्ये जे आहे ते 'सत्य‘ आहे. परंतु मनुष्याने बुद्धी आणि कल्पनाशक्तीच्या बळावर स्वतःचे एक स्वतंत्र 'आभासी विश्व' निर्माण केले आहे. ज्यामध्ये अधिकाधिक गुरफटतो आहे. त्यावर भाष्य करतांना ते लिहितात-

'किती निर्लज्ज टोकाची

इमोजी हासरी आहे '

निर्मिकाने ‘लज्जा आणि हास्य‘ फक्त मानवास बहाल केलेले आहे. परंतु आभासी विश्वात तेही 'सजीवत्व' तो निर्जीवास बहाल करतो आहे. मनात उचंबळून येणारे, चेहऱ्यावरचे भाव 'इमोजी' मध्ये शोधतो आहे. काय ही विडंबना? प्रत्यक्ष भेटीतून ज्ञानेंद्रियांमार्फत सर्वांगास शिरशिरी आणणारा अनुभव निर्जीव इमोजी देवू शकणार का? हा प्रश्न त्यांनाही भेडसावतो आहे. चित्रकाराने चित्र कितीही जिवंत काढले, तरी ते जिवंत नसते. म्हणून 'लज्जा आणि हास्य' हे इमोजी मध्ये न शोधलेले बरे! कदाचित हेच वास्तव आपण स्वीकारले पाहिजे.  वास्तविक 'ॐ नमोजी ' पासून सुरु झालेला मानवाचा प्रवास आभासी 'हम्मम -इमोजी ' वर थांबतो की काय? असा प्रश्न विचारणारा शेर अंतर्मुख करून जातो.

येणारी प्रत्येक नवी पिढी नवीन तंत्रज्ञान, वैज्ञानिक संसाधने यांच्यासह जन्माला येते. तंत्रे आणि यंत्रे सहज वापराची हातोटी त्यांना शिकावी लागत नाही. रोजच्या हाताळण्यातून ते सहज जमतं. त्यामुळे तरुण पिढी उत्साहाने, ऊर्जेने आणि अभ्यासाने ओतप्रोत असली पाहिजे असे जुन्या पिढीला वाटत असते. फारशा सोयी सुविधा नसतांना कमावलेले प्राविण्य, प्रतिष्ठा आणि यश याचा आदर्श त्यांच्यासमोर असतो. परंतु आजच्या तरुणांना हे सर्व सहज उपलब्ध असतानाही ती आळसावलेली दिसते. हीच खरी खंत आहे. याच पिढीला ढोलकीची उपमा देऊन गझलेचा शेवट करतांना ते लिहितात-

'सुरा-तालात का कच्ची

नवी जर ढोलकी आहे '

बदल स्वीकारण्याची आणि करण्याची धमक फक्त तरुण रक्तात असते, त्यामुळे नव्या पिढीने आव्हाने स्वीकारून स्वतःला झपाट्याने बदलत असलेल्या जगासोबत ट्यून केले पाहिजे, असे कवीला वाटते. म्हणूनच त्यांच्यासमोर प्रश्न उभा केला आहे.  त्यांच्यातील उत्सुकतेला, ऊर्जेला आणि समन्वय साधण्याच्या कलेला प्रोत्साहन देत देत आव्हान देण्याचे कामही केले आहे. असा एका दगडात दोन पक्षी मारणारा हा अप्रतिम शेर नव्या पिढीला 'सुरा-तालाचे ' पक्के भान देऊन  जातो. 

श्रीकृष्ण राऊत यांच्या सर्वच गझला आशयाने ओतप्रोत, जीवनाचे तत्त्वज्ञान कमीत कमी शब्दांत, अतिशय सोप्या भाषेत उलगडून सांगणाऱ्या असतात. शेर वाचताक्षणीच तोंडातून आपसूक वाह! निघते. प्रत्येकाच्या अनुभुती विश्वाला एक वेगळा आयाम नव्याने कळलेला असतो. एखाद्या विषयाकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन मिळालेलला असतो. आणि यामुळेच त्यांच्या  शेरातील खयाल भाषिक उपयोजनाच्या दृष्टीने भावनाविष्कार ते सुविचार आणि सुविचार ते सुभाषित या उंचीवर पोहचतो. 

....................................................

प्रा. डॉ. विनोद देवरकर

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा

ईमेल: devarkar28@gmail.com

मोबा.: 9421355073

गझल : श्रीकृष्ण राऊत : तुझ्या हासण्याचे दिवाणे किती : पुन्हा एकदा नव्या आकर्षक रूपात : संगीतकार-गायक : प्रा.हर्षवर्धन मानकर,


 

तीन गझला : मीनाक्षी गोरंटीवार

१.

खोल तळाशी दु:खांना मी लपवत गेले आयुष्या
म्हणून बहुधा तुला नव्याने  घडवत गेले आयुष्या

सुख दु:खाची ऊन सावली आली जेव्हा वाट्याला
आशेचे मी रोप अंतरी रुजवत गेले आयुष्या

कुठे भरवसा उरला होता हाय घेतल्या श्वासांचा
म्हणून जगणे क्षणक्षण माझे सजवत गेले आयुष्या

संसाराच्या प्रवासामधे लाख संकटे विवंचना
गझल भेटली अन् काट्यांना तुडवत गेले आयुष्या

तुला द्यायचे तसे दान तू बेलाशक दे आयुष्या
कर्तृत्वाने असे तरी मी बहरत गेले आयुष्या

नकळत माझ्या अवतीभवती व्यथा पसरली वेगाने 
त्या वलयाला अनुभव मानत मिरवत गेले आयुष्या

गुंतत गेली नाती सारी संशयातल्या  धाग्यांनी
आपुलकीने बसल्या गाठी उसवत गेले आयुष्या


२.

भेदत जाते  क्षितिजाला ती आव्हानांना कचरत नाही
बाईपण हे पेलत जाता व्यथा मनाची मिरवत नाही

मृगजळ होते फक्त सुखाचे वेड्यासम मी धावत गेले
इतके कळले सहजासहजी सुख हाताला गवसत नाही

तुला सांगते वाटेवरती आयुष्याच्या तू असताना
फक्त चालते ऊनसावली, खाचा खळगे मोजत नाही

जीवलग सखा सोबत नाही किती दुरावा छळतो आहे
मंतरलेला तुझा नि माझा ऋतू गुलाबी विसरत नाही

काळजावरी भळभळणारी जखम खोल तो करून गेला
दु:खाला त्या टाचत गेले, काळजास मी उसवत नाही

झाले गेले घडून गेले बनव नव्याने छबी  माणसा
लाचलुचपती काळा पैसा कधीच याला बरकत नाही

लाखो झाले बेघर येथे  सारेकाही  झाले स्वाहा
मानवतेला  लाजविणारे युद्ध तरीही थांबत नाही


३.

पडझड झाली ज्या नात्याची ते टाळावे म्हणते
मार्गावरुनी  वेगवेगळ्या  मी चालावे म्हणते

व्यर्थ डांबुनी  ठेवल्या व्यथा खोल मनाच्या डोही
मुक्त होउनी घळघळ साऱ्या वाहू द्यावे म्हणते

उगा कशाला  ह्या जीवाचे  दुःख  कुणाला सांगू ? 
खोटे हसरे जरा मुखवटे मी ओढावे म्हणते

पैलतिरावर कृष्ण सख्याची तेथे वेणू वाजे
ऐलतिरावर व्याकुळ राधा श्यामल व्हावे म्हणते
               
पहाट वारा बिलगत जातो जेव्हा मजला वेडा
पुन्हा एकदा मिठीत अलगद तुझ्या शिरावे म्हणते

खोट्या नाट्या परंपरांवर विश्वास नसे माझा
झुगारून ते रिवाज सारे  डोळस  व्हावे म्हणते

आयुष्याच्या खडतर वाटा तुडवत गेले पायी
दमले आता घडी दोघडी  मी थांबावे म्हणते
 
- मीनाक्षी गोरंटीवार 


दोन गझला : डॉ.स्नेहल कुलकर्णी


१.

प्रेम कृष्णासारखे शृंगारले नाही कुणी
शल्य राधेच्या पतीचे जाणले नाही कुणी

दुर्दशा पाहून त्याची लोक हळहळले किती
व्यंग पाहुन भाळलेले भेटले नाही कुणी

एकदा ते वाहिले,आजी तुझ्या गोष्टीमधे
कावळ्याचे घर नव्याने बांधले नाही कुणी

तू मुलीजागी म्हणाले आदबीने कैकजण
मात्र जावळ माउलीगत हुंगले नाही कुणी

वेदना नाही तिथे घरदार त्याचे राहते
वेगळे आगर सुखाचे बांधले नाही कुणी

स्वच्छता त्यांची करावी वाटली नाही कशी?
आंधळ्या डोळ्यांत अंजन घातले  नाही कुणी

घालतो आधी शिवी अन् मग मला म्हणतो असे
एक तू सोडून स्नेहल चांगले नाही कुणी


२.

घर जरी राजाप्रमाणे बांधले नाहीस तू
कर्ज डोक्यावर मुलाच्या ठेवले नाहीस तू

पाहिजे होती तुझी जवळीक सख्ख्यासारखी
शल्य सवतीच्या मुलाचे जाणले नाहीस तू

चांदण्या केसात माझ्या माळुया म्हटलास अन्
आजही आभाळ खाली आणले नाहीस तू

बांधले गेले नदीच्या संथ पात्रावर धरण
सागरी पाण्यास कुंपण घातले नाहीस तू

द्वेष शत्रूसारखा केलास रुसल्यावर पुन्हा
प्रेम माझे तेवढे शृंगारले नाहीस तू

मात्र ते दुष्प्राप्य असते बोलले कोणीतरी
फूल नंतर उंबराचे शोधले नाहीस तू

पाठ वरचेवर तुझी का भाजली सूर्यापुढे ?
ऊन स्नेहलसारखे कवटाळले नाहीस तू

तीन गझला : विजयानंद जोशी

१.

पेटवायची आग थोडिशी असे शेवटी ठरले
पेटवल्यावर त्यांच्यासह मग बरेच काही जळले!

जशी अचानक कुठून पडली सत्याची ती ठिणगी
जंगल नंतर सर्व भ्रमांचे जळत त्यामधे बसले

उत्तर देण्यासाठी म्हणून तोंड उघडले जेव्हा
सैन्यच खुनशी प्रश्नांचे तुटुनी त्याच्यावर पडले!

काय आणखी दिले तुम्हाला म्हणजे पटेल खात्री?
रक्तातिल चैतन्य तेवढे आहे शिल्लक उरले!

उगवलो इथे आणि मिसळेन इथल्या मातीमध्ये
कुठे विचारत आहे पण मातीला मी काय दिले?

२.

एक नवे घरटे आधी शोधू आपण
त्यानंतर अपुला पक्षी शोधू आपण

गंभीर किती वक्ता जे सांगत होता
तरी कशी टाळी पडली शोधू आपण

कोंडलोत चारी बाजूंनी या जागी
असतिल त्या अदृश्य फटी शोधू आपण

प्रेमहि करते, खच्चुन भांडण माझ्याशी
कोण नेमकी तुझ्यातली शोधू आपण

जिने आणले नकळत या भोवर्‍यामधे
बुडण्यापूर्वी ती होडी शोधू आपण

दंगल मोठी...राख शेवटी ठरलेली
कोणाची पहिली काडी शोधू आपण

जळून गेली सगळी स्वप्ने अन् इच्छा
कुणी तिची फुंकली विडी शोधू आपण

३.

कोण जाणे काय म्हटले त्या क्षणाला;
नेमके मग काय घडले त्या क्षणाला

जर मला पटवून कोणी सांगते तर
घट्ट मी असते पकडले त्या क्षणाला

हे नसे काही नव्याने बाधलेले
हे असावे खूळ जडले त्या क्षणाला

एकदा भेटायचा होता दिलासा
रद्द झाले अन् बिघडले त्या क्षणाला

तोल सोडुन बोलला पुष्कळ तिला तो
आणि नाते हाय तुटले त्या क्षणाला

जो खुला पर्याय दिसतो तो स्विकारा
फक्त इतके मी सुचवले त्या क्षणाला

गैर नक्की फायदा घेणार दिसले
मत जुने मग मी बदलले त्या क्षणाला

वाटले जेव्हा धरावा घट्ट आता
दोन हातांनी जखडले त्या क्षणाला

तीन गझला : प्रतिभा सराफ


१.

जरी असे अशी-तशी तुझीच मी!
तुलाच गोंदले उरी तुझीच मी!

उजाडतो तुझ्यासवे दिवस इथे
पहाटच्या दवापरी तुझीच मी

दुपारच्या उन्हात उब ही तुझी
सुखावते उन्हातही तुझीच मी

धपापतो उरात श्वास साजणा
कवेत शांत मज करी तुझीच मी

न भेटला न बिलगलास राजसा
न स्पर्शता शहारली तुझीच मी

सभोवती तुझ्यासवे उनाडते
लबाडशी परी जशी तुझीच मी

हसू नको, रडू नको, जगू कशी?
तुझ्याविना फुलू कशी?तुझीच मी

लहानशी गझल तुलाच वाहते
कबूल तू महाकवी तुझीच मी

२.

पाऊस बोलतो आहे संवाद साधतो आहे
माझ्याच मुक्या बोलांना थेंबात ओवतो आहे !

पाऊस असा येताना,मातीत खोल रुजताना
हृदयात कोंब प्रेमाचा अलवार उगवतो आहे!

पाऊस बांधतो तोरण दारात लाखमोलाचे
बाहेर आत सौख्याचे संसार फुलवतो आहे!

पाऊस आज आलेला घेऊन गंध मातीचा,
भावूक ओल जगण्याची श्वासात गुंफतो आहे

पाऊस गात येताना धरतात ताल पानेही
मिसळुनी सूर वाराही गाण्यास सांगतो आहे

पाऊस कधी एकांती विरहाच्या कातर राती
सोबतीस आता माझ्या पाऊस जागतो आहे

३.

झाल्या चुका असू दे रस्ता नवा धरू या
हळुवार आठवांनी जखमा जुन्या भरू या

लटकाच राग माझा धरलास का अबोला?
तू मौन सोड आता, संसार सावरू या

मिटवू अता दुरावा, नैराश्य, राग सारा
घरट्याकडे वळू या,ये प्रेम अंथरू या

चाहूल पावसाची मनमोर धुंद झाले
हातात हात धरुनी थेंबात मोहरू या
                               
पदरात बांधले मी अंधार भोवतीचे
वस्तीत चांदण्यांच्या निर्भीड वावरू या

उरले तुझे नि माझे आयुष्य फार थोडे
दुःखास ठोकरू या सौख्यास पांघरू या

.................................
प्रतिभा सराफ
pratibha.saraph@gmail.com
98925 32795

दोन गझला : सौ. वैशाली भागवत


१.

पाहिली स्वप्ने तळाशी गाडताना   
उंच झाला ढीग त्यांचा  बांधताना  

वाटले सारेच माझे संपले की   
फक्त ‘देह’च राख झाला जाळताना  
 
व्यापतो आहेस तू जर या जगाला 
वेगळा दिसतोस का तू पूजताना 
  
चेहऱ्यावर हास्य होते मांडलेले  
कोणता कप्पा मनाचा सांधताना 

या नदीला काय झाले कोण जाणे  
का अशी वेडावली ती वाहताना 

२.

थोडेसे शिंपडले अत्तर  मी नात्यावर
नोंद सुगंधी दुःखाची झाली नावावर

अधे मधे का फितूर होते मन माझ्याशी
कसे कधी ते तुझेच होते तू दिसल्यावर 

पापणीत स्वप्नांना उगाच का सांभाळू ?    
गरज तशी पण कशास त्यांची तू असल्यावर 

सजलेल्या भिंतींना म्हटले घर सर्वांनी 
कोनाडे भिंतींचे दु:खांनी भरल्यावर 

भाळावर दैवाने काहीसे लिहिताना 
नाव तुझे मी कोरत आले त्या भाग्यावर 
.................................
सौ.वैशाली भागवत , बडोदे

दोन गझला : विशाल कन्हेरकर


१.

अन्यायावर घाव शिवाजी
स्वातंत्र्याचे नाव शिवाजी

वीर निपजले लाखो जेथे
त्या मातीचा गाव शिवाजी

दिसता सावट अन्यायाचे
आत उसळतो ताव शिवाजी

छाती ज्याची पोलादाची
तोच मराठा साव शिवाजी

बिथरुन जाती लाखो फौजा
ऐसा गनिमी डाव शिवाजी.

अबलांचा हा रक्षणकर्ता
इतिहासाला ठाव शिवाजी

संकट जेव्हा येते अवचित
हाक उमटते धाव शिवाजी

आयुष्याचा स्फूर्तीदाता
जगण्यामधला भाव शिवाजी

२.

मला माणसा तू बरा पाहिजे रे
तुझा चेहरा हासरा पाहिजे रे

जिथे रोज घडते असे कृत्य खोटे
तिथे माणसा तू खरा पाहिजे रे

तिमीरात उजळे सदा ज्योत ज्याची
असा दीप साऱ्या घरा पाहिजे रे

मनाला तुझ्या या न आवर कदापी
तुझा नम्र बाणा जरा पाहिजे रे.

सुखाने जगावे मनाच्या किनारी
अशी घट्ट अविचल धरा पाहिजे रे

.................................
विशाल कन्हेरकर.
मो.9172298839.

दोन गझला : सौ. प्रतीक्षा नांदेडकर


१.

घेतला विमा शरीराचा 
नाहीच मिळत नशीबाचा 

येतो जातो हवे तेंव्हा 
काय भरवसा पावसाचा 

भान हरपले, मन गुंतले 
ध्यास लागता सावळ्याचा 

कर्तृत्वाने जिंकून मन 
झाला शिवबा समाजाचा

शक्तीपेक्षा श्रेष्ठ युक्ती
नियम सांगतो लढायाचा

२.

झाले माझे वय आज जरी सत्तर 
मुलांकरीता सदैव बनते कणखर 

सबला नारी होण्यासाठी पोरी 
घे तू आता पाठीवरती दप्तर

येता अडचण फार वाटते अवघड  
कधीकधी तर वेळच असते उत्तर 

जिव्हाळ्याने सुंदर फुलते जीवन 
नात्यात कधी नकोस ठेवू अंतर 

मुलगा-मुलगी भेद कोणता नसतो 
गिरवू अक्षर, समाज घडवू साक्षर

.................................
सौ. प्रतीक्षा किरण नांदेडकर
सिंगापुर


दोन गझला : प्रणव बनसोडे



१.

भक्तीत आज धरला मी पाय विठ्ठलाचा 
झाला लगेच तेव्हा वर्षाव अमृताचा 

ना गुंफला कधीही सौख्यात मी फुलोरा 
आला कुठून आता हा गंध मोगऱ्याचा?

सांगा कसा न व्हावा आनंद ह्या मनाला?
प्रेमात आज झाला जर स्पर्श चांदण्याचा

बहरून काल असता झाले विराण सारे 
कळला नसे कुणाला हा खेळ प्राक्तनाचा 

संकल्प सोडलेला जिंकायचेच आहे
घेतो ‘पिके’ जरासा आधार सावल्यांचा

२.

वैऱ्यासोबत सख्याप्रमाणे वागत आहे 
हरिचरणाशी सौख्य जगाचे मागत आहे

प्रेम, प्रतिष्ठा, पद, पैश्यांची राखच होते
सत्य सारखे स्मशानभूमी सांगत आहे 

तुझ्यासोबती पहिल्या वहिल्या पावसामधे
भिजून जावे ओढ मनाला लागत आहे

मनगटात बळ, मनात आहे इच्छाशक्ती
म्हणून अमुचे अनुदानाविण भागत आहे.

कष्ट पाहुनी पळून गेले कैक शहाणे 
‘पिके’ आजही आनंदाने रांगत आहे

तीन गझला : चैतन्य कुलकर्णी


१.

वारा तर खिडकीशी बोलत आहे
फरशी का मग इतकी तापत आहे

माकड होते आहे बघणाऱ्याचे
ती मगरीचे अश्रू ढाळत आहे

पानावरची जागा पुरली नाही
खयाल सध्या खोली मागत आहे

धूळ चारली याआधी नियतीने
प्राक्तन आता पाणी पाजत आहे

अपुले फसणे नवे आपल्यासाठी
काळ योजना जुनीच आखत आहे

गरजेपुरता सौदा केला आपण
सौदा आहे म्हणून भागत आहे

रोज परीचे हाल पाहतो आम्ही
आजी खोट्या गोष्टी सांगत आहे


२.

ऐकणाऱ्या माणसाचा कान सोकावू नये
पाखराने एवढेही गोड किंचाळू नये

रोज दुःखाची उन्हे मी या अटीवर सोसली
दोन डोळ्यांच्या तळाशी सावली साचू नये

ऊब प्रेमाची हवीशी वाटते काही दिवस
प्रेम करताना तरीही भाकरी जाळू नये

ताटवाट्यातून होऊ द्या मिठाची कौतुके
मोहरीच्या वेदनेचा थांगही लागू नये

ही तुझी दानत ठरावी आणि माझी सूज्ञता
तू मला देऊ नये अन मी तुला मागू नये


३.

दुपार म्हणते जमेल तितके टाळ मला
रोज बिलगते आहे संध्याकाळ मला

ओळींमध्ये घुटमळणे तू सोड जरा 
एके दिवशी नुसते वरवर चाळ मला

पुन्हा पाहतो भेदरलेले पाडस मी
पुन्हा आठवत जाते माझी नाळ मला

दुष्कर्मांनी नासत गेला हात किती
टोचत आहे नामजपाची माळ मला

रोवू आता बीज कोणत्या कवितेचे
उकरू बघतो पुन्हा व्यथेचा फाळ मला

हुज्जत घालत बसतो भाजीवाल्याशी
बस! लिहिताना सतावतो दुष्काळ मला
.................................

© चैतन्य कुलकर्णी 'शुऊर'

दोन गझला : विनोद बुरबुरे


१.

तुझे मोल आता कळू लागले बघ
दिशेने तुझ्या ते वळू लागले बघ

गुलामीत सारे जरी रोखलेले
तुझी हाक येता पळू लागले बघ

जिणे संकटाचे विनाशाप्रमाणे
तुझ्या लेखणीने टळू लागले बघ

तुटू लागल्या जात-पाती अशा की
मनूचे मढेही जळू लागले बघ

लळा गौतमाचा इथे पेरण्याला
निळे रक्त हे सळसळू लागले बघ

न वाली कुणीही तुझ्या कारव्याला
जुने पान आता गळू लागले बघ

कराया निघाले जगाचे भले जे
गळा फास का आवळू लागले बघ

२.

झालो महाड -पाणी,आता उठाव होतो
व्याकूळल्या जिवांच्या ओठी तलाव होतो

कोणावरी भरोसा करतो समाज माझा
दो चार भाषणांनी का भीमराव होतो ?

मी झेलतो जरीही लाखोत वार त्यांचे
खोलात काळजाच्या माझ्याच घाव होतो

जयभीम हाक देता अंधारल्या दिशांना
घेऊन मशाल हाती एकत्र गाव होतो

गेली किती युगेही माझ्यावरून ऐसी
मी सर्व त्या युगांचा झाला पडाव होतो
.................................
विनोद बुरबुरे
यवतमाळ
मो.9096708377

तीन गझला : रमेश सरकाटे

१.

जगणे कसे जगावे अंधार पीत आम्ही 
करतो विद्रोह सारे दुखणे लिहीत आम्ही

हल्ले कितीक केले आम्हां वरीच त्यांनी 
कापून काढले ना होऊन जीत आम्ही

झाले पिढ्यापिढ्यांना दुर्लक्ष शिक्षणाचे 
ना पाळतो अता ती मुर्दाड रीत आम्ही

जगतो खुशीत आता भीमामुळेच सारे
चिंतेत का जगावे अन भीत भीत आम्ही

आहो पुढारलेले  सारेच  शिक्षणाने
करतो सदैव आता वैऱ्यास चीत आम्ही

संघर्ष रोज केला उद्देश गाठण्याला
बसलो मुळीच नाही दुःखे करीत आम्ही

देतो अभय तयांना येतात शरण जे जे 
पेरत तथागताची ही 
धम्म-प्रीत आम्ही 

२.

सदा कदा फुशारकी कशास मारतोस तू 
भ्रमिष्ठ ह्या जगास का घमेंड  दावतोस तू

नसे कुणा तमा तुझी असे तहानला जरी 
चुकार स्वप्न कोरडे उगीच पाहतोस तू

नसेल रोजगार जर उपास ठेव रोज तू
रडून दोष शासना खुशाल ठेवतोस तू

उदास जीवनात ह्या उजाड मार्ग चालता 
नको तिथे झुकून का उगाच भाळतोस तू

उधाणल्या मनास रे कितीक आवरायचे
गुपीत का मनातले हसून सांगतोस तू

प्रवास संपल्यावरी अजून राहतोस का 
सुखास पकडण्या उगा कशास धावतोस तू 

जुन्या गलीतले कसे जुनेच याद येतसे 
मनातल्या स्मृतीस का
अजून चाळतोस तू

३.

तुझी औकात आहे तर जगाला पण कळू दे ना 
कुणाला मुंग छातीवर निराशेने दळू दे ना 

कपाळी भाग्य लिहिले ना असे रेषेत हाताच्या
बघ्यांना जोरका झटका विचाराने  हळू दे ना 

किती अन्याय होतो बघ इथे तर द्रौपदीवरती
कुठे आक्रोश बघताना मनाला सळसळू दे ना 

नको घाई करू इतुकी तुझ्या एका नकाराची 
घरावरचे दुखी वादळ जरा माझे टळू दे ना

किती रे पाळतो खोट्या नकोशा अंध श्रद्धा तू
मनाच्या ह्या विकारांना विपश्येने जळू दे ना

दिलासे संविधानाने दिले आम्हा जरी आहे 
असे जे हक्क सरकारी घरी माझ्या वळू दे ना 

घराबाहेर आईला नको काढू कधी भाऊ
तिचे उपकार थोडे पण तुझ्यावरचे ढळू दे ना

तीन गझला : मसूद पटेल


१.

दुःखे तऱ्हेतऱ्हेची  वाढून  रीतसर
तो सांगतोय मजला की जेव पोटभर

कापून जीभ माझी फर्मावले मला
आता मनाप्रमाणे बिनधोक प्रश्न कर

ताटातुटीस अमुच्या युग लोटले तरी
नजरेतुनी छवी ती गेली न आजवर

आहेत जर घरातच ग्रंथालये जिती
तू टाक सुरकुत्यांवर त्यांच्या कधी नजर

सागर जरी हजारो आलेत आडवे
अपुली तहान आम्ही जपली हयातभर

उंची जरा कळूदे आम्हा तुझी खरी
गंजीवरुन शवांच्या खाली जरा उतर

२.

आधी व्यथेस अपुल्या प्रेमात पाडतो मी
पेल्यामधे तिला मग बुडवून टाकतो मी

प्रेमी विफल भलेही मरणे कमाल समजो
असली कमाल त्यांचे जगणेच मानतो मी

दरसाल माय गावी बोलावते परंतू
मारून थाप जाणे दरसाल टाळतो मी

लब्बाड जिंदगानी पिच्छा करीत आहे
मित्रा म्हणून इतक्या वेगात धावतो मी

नंदनवने स्वतःची देऊन दान आता 
बाभुळवनास छाया भिक्षेत मागतो मी

क्षणभर उजेड येतो डोळ्यांमधे अधू या
अलबम जुनाट जेव्हा दररोज चाळतो मी

ऐकू जरूर येइल दुनिये तुला उद्या ते
मौनामधून अपुल्या जे आज सांगतो मी 

३.

वार्धक्य हे काही अम्हा फुकटात नाही लाभले
तारुण्य त्यासाठी अम्ही साक्षात आहे जाळले

हिसकावल्या डोळ्यातल्या ज्योती अगोदर आमच्या
नंतर कुठे मग आरशा पुढती अम्हाला आणले

शोकेसच्या वस्तू मला दररोज हाका द्यायच्या
कंटाळुनी मी शेवटी जाणेच तिकडुन टाळले

क्षणभर  हसूची मोजली किंमत अशी भरपूर की
आयुष्यभर मग सारखे मजला रडावे लागले

लाटच कधी नेइल तटी आशेवरी या शेवटी
तारू प्रवाहाच्या अम्ही स्वाधीन केले आपले

सांगायला तैनात होतो रक्षिण्या साठी दिवे
आदेश सारे मात्र मी कायम हवेचे पाळले
................................
मसूद पटेल                ९६०४६५३३२२